कविता अन् बरंच काही...
Mar 27, 2023
जागतिक कवितादिन विशेष
काव्यशास्त्रविनोदेन कालौ गच्छति धीमताम्| अर्थात विद्वजन त्यांचा वेळ हा काव्य, शास्त्र आणि हास्यविनोदात व्यतित करतात. जन्माच्या आधीपासून माणसाची नाळ ही कवितेशी जोडलेली असते. माणसाला कवितेची पहिली ओळख ही आईच्या गर्भातच होते... कारण आईच्या ह्रदयाचे लयबद्ध ठोके, हे त्या बाळासाठी आश्वासक काव्यच असतं, आणि जेव्हा ते बाळ जन्माला येतं, शब्दांशी त्याची गाठभेट होते, तेव्हा त्या लयबद्ध काव्याला मूर्तरुप प्राप्त होतं.
कवितेची साधीसोपी व्याख्या म्हणजे, वाक्यम् रसात्मकम् काव्यम्| अर्थात् रसपूर्ण वाक्याला काव्य म्हणतात. साहित्यातले नवरस इतर कोणत्याही साहित्य प्रकारापेक्षा कवितेतून जास्त प्रभावीपणे मांडता येतात. म्हणूनच व्यास-वाल्मिकींसारख्या ऋषीमुनींनी आपली प्रतिभा काव्यरुपानेच प्रकट केली. रामायण-महाभारतासारखी आर्षमहाकाव्य त्यातूनच निर्माण झाली.
सर्वसामान्यांच्या मनाची पकड घेण्याची अफाट ताकद कवितेत आहे. म्हणूनच संतांनी आपली शिकवण मांडण्यासाठी काव्याचा आधार घेतला. ज्ञानेश्वरांच्या ओव्या, एकनाथांची भारूडं, तुकोबांचे अभंग किंवा समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. या सगळ्या संतांनी विविध काव्यरुपांच्या माध्यमातून त्या त्या काळात प्रबोधन केलं.
कविता माणसाच्या अत्यंत जवळची असते, कारण शब्दांचा अर्थ कळत नसला तरी चाल आणि ताल त्याला कळतात. ‘नीज नीज बाळा रे’ च्या तालावर तो झोपतो, ‘अडगुळं मडगुळं’ च्या तालावर तीट लावून तयार होतो, ‘सोनू उभा राहिला, आम्ही नाही पाहिला’ ऐकत तो उभं रहायला शिकतो, ‘एक पाय नाचव रे गोविंदा’ च्या तालावर चिमुकले पाय आपटून नाचतो. ‘ये रे ये रे पावसा म्हणत’ पावसात चिंब भिजलेला असतो.
कवितेची कितीतरी रुपं आणि किती अंग आहेत, तिचं प्रत्येक रुप सालंकृत आहे, मनमोहक आहे. अभंग, भक्तीगीतं, भावगीतं, लोकगीतं, चित्रपटगीतं, बालगीतं, बडबडगीतं, कुटगीतं, स्फुटगीतं, स्त्रीगीतं, कोळीगीतं, आरत्या, गण, गौळण, लावणी, ओव्या, पोवाडे, आर्या, गझल, हायकू, रुबाई, शायरी, वात्रटिका, चावटिका, क्षणिका, गोंधळ, भारूड, सवाल-जवाब, श्लोक, सुनीता, पटके, दोहे या सगळ्या प्रांतात कविता मुशाफिरी करते.
पूर्वीच्या काळी लग्न होऊन सासरी गेलेल्या बायकांसाठी जात्यावरच्या ओव्या, मंगळागौरीची गाणी ही व्यक्त होण्याची साधनं होती. बहिणाबाईंच्या भाषेत सांगायचं झालं तर, अरे घरोटा घरोटा, तयातून पडे पिठी, तसं तसं माझं गानं पोटातून येतं ओठी. अर्थात् जितक्या सहजतेने जात्यातून पीठ बाहेर येतं, तितक्या सहजतेने माझ्या ओठी गाणं येतं, जन्म घेतं.
तमाशा ही महाराष्ट्राची ओळख, तमाशा ही महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली, भिनलेली लोककला. नृत्याची लय, ढोलकीचा ठेका, नर्तकीचं लावंण्य यासोबतच लावणीत रंगत आणतात ते शाहीरांची कवनं आणि सवाल जबाब. हे सवाल जबाब रचत असताना जेवढी संदर्भसंपृक्तता महत्वाची, तेवढीच महत्त्वाची असते काव्याची जाण, प्रतिभा. उदाहरण बघा, एकाने सवाल केला, ‘बीज ही असते जरी नराचे, रुजते नारीच्या उदरी... जन्म देऊनी जीवास नारी, घेते आईपण पदरी. नियम असे हा निसर्गाचा घडले पण रे अकल्पित, कोण जाहला पुरुषची ऐसा, आई म्हणूनी जगतात.’ तर याला उत्तर देणारा म्हणतो, ‘सवाल ऐसा बरवा केला, धन्यवाद घे तुज म्हणुनी, युगपुरुषाचे नाव ऐकता, ऊर ही येई हा भरुनी. ज्ञानेशाच्या ओठी ओवी या भूमीवर अवतरली, ब्रह्मचारी हा योगी नर, होई ज्ञानेश्वर माऊली...
काव्य हे मुळात एक शास्त्र आहे. शास्त्र हे नियमात बांधलेलं असतं. तशीच कवितासुद्धा छंद, वृत्त, अलंकार, यात गुंफलेली असावी अशी अपेक्षा असते. असच छंद, वृत्त, अलंकार यांनी परिपूर्ण काव्य मराठी साहित्याला लाभलं ते पंतकाव्याच्या रूपाने. अनेक अलंकारांपैकी 'अन्योक्ती' अलंकार समर्थपणे पेलला तो कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी. आता त्यांचीच कोकिलान्योक्ती पहा 'येथे समस्त बहिरे वसताती लोक, का मधुर भाषणे तू करिसी अनेक? हे मूर्ख! यांना किमपीही नसे विवेक, वर्णावरून तुजला गणतील काक'
कवी आणि त्यांच्या कवितांच्या शैलीबद्दल लिहिताना कुसुमाग्रज म्हणतात 'धरेस सांगाल का कधी? वाहत जा तू जलापरी, धगधगत्या विजेस म्हणाल का? येऊन बैस तू दवापरी?' प्रत्येक कवीची व्यक्त होण्याची पद्धत निराळी असते. कवीच्या स्वभावानुसार कवितेचा स्वभाव ठरतो आणि म्हणूनच कवितेचे हे शब्द त्या कवीच्या अंतर्मनाची एक झलक आपल्याला दाखवून जातात.
कविता हा भाषेचा सर्वप्रथम आविष्कार आहे. इतर साहित्यप्रकारांपेक्षा तिचा रूपबंध वेगळा आहे. कारण कथा, कादंबरी, म्हंटल की तिथे कथनात्मकता आवश्यक असते, नाटक म्हंटल की तिथे नाट्यमयता येते. पण कवितेत सगळ्यात आधी आणि सर्वाधिक महत्वाचा असतो तो भाव. जागतिक दर्जाच्या कवी वर्ड्सवर्थ म्हणतो की 'A spontaneous overflow of powerful feelings means poetry' म्हणजेच उत्कट भावनांचा उत्स्फूर्त आणि सौंदर्यपूर्ण आविष्कार म्हणजे कविता.
छंद, अलंकार, गेयता, उत्स्फूर्तता, आर्तता, उत्कटता ही कवितेची महत्वाची अंग आहेत. तशीच शब्दांची आणि भावनांची सुयोग्य सांगड घालत रचना करणं हा कवितेचा गाभा आहे. शब्द आणि भावनांची सुयोग्य रचना मला ठायी ठायी जिथे प्रत्ययाला आली ते म्हणजे ग. दि. माडगूळकरांच्या गीतरामायणात. वृद्धत्वाकडे झुकल्यानंतरही अपत्यप्राप्ती न झालेल्या दशरथाबद्दल लिहिताना गदिमा म्हणतात 'कल्पतरूला फुल नसे का? वसंत सरला तरी'...
जास्तीत जास्त आशय कमीत कमी शब्दात प्रभावीपणे मांडणं हे कवितेचं बलस्थान विं.दा. करंदीकरांच्या 'घेता' या कवितेत आपल्याला कवितेच्या या बलस्थानाची प्रचिती येते. सावरकरांनी मातृभूमीच्या विरहामुळे त्यांच्या मनात निर्माण झालेली व्याकुळता एखाद्या पुस्तकाच्या माध्यमातून मांडली असती तर कदाचित ती हृदयाला इतकी भिडली नसती जितकी ती त्यांच्या 'सागरास' या कवितेतून मनाला भिडते.
वंगभंगाच्या चळवळीत 'वंदे मातरम' या काव्याचा प्रभाव एवढा जास्त होता की संपूर्ण भारतीय जनतेसाठी ते काव्य वेदमंत्रांइतकं वंदनीय ठरू लागलं होतं. संयुक्त महाराष्टाच्या चळवळीत आचार्य अत्रे, ना.ग. गोरे, यांसारख्या दिग्गजांच्या भाषणांने, वक्तृत्वाने, महाराष्ट्र जितका ढवळून निघाला होता, तितकाच तो शाहीर अमरशेखांच्या पोवाड्यांनीही ढवळून निघाला होता. मोर्चाच्या अग्रभागी उभं राहून 'जाग मराठा जाग, जमाना बदलेगा' असं खड्या आवाजात म्हणणाऱ्या अमरशेखांना बघण्यासाठी, ऐकण्यासाठी लोक रस्त्याच्या कडेला दुतर्फा गर्दी करत असत. ही असते कवितेची ताकद.
प्रेम, निसर्ग, करुणा या भावात्मिक अवस्थतेतून कवितेला बाहेर काढत 'एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकीन मी ती स्वप्राणाने' असं म्हणत केशवसुतांनी आधुनिक कवितेची तुतारी फुंकली. तर याच मराठी कवितेला वास्तवाचं भान दिलं ते दलित कवींनी... अण्णाभाऊ साठे, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, वामनदादा कर्डक यांनी वंचितांच्या जीण्यातली दाहकता कवितेच्या माध्यमातून जगासमोर आणली. 'शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली... भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली...' आकाशातील चंद्राच्या शीतल सौंदर्यापेक्षा पोटातली आग शांत करणारा भाकरीचा चंद्र कष्टकरी जनतेसाठी किती महत्वाचा आहे हे नारायण सुर्वेंच्या कवितेने दाखवून दिले.
कवितेचं गाव नाही, तर कवितेचं अवघं विश्व आहे... जे अफाट आणि सुंदर आहे. पण आज कुठेतरी आमची पिढी कवितेपासून काहीशी दूर जाताना दिसतेय. आधुनिकतेमुळे रोजच जीवन गतिमान झालं आणि त्याचा परिणाम म्हणजे ४००० ओव्यांचं दीर्घकाव्य, त्यानंतर ४०० ओळींचं खंडकाव्य, ४ कडव्यांचं गीत, १४ ओळींचं सुनीत ते आता अवघी चारोळी असा कवितेचा प्रवाह आक्रसत गेलाय. अभ्यासक्रमातल्या कवितासुद्धा गुण मिळवण्यापुरत्या मर्यादित राहिल्यात.. प्रश्नपत्रिकांच्या सबजेक्टिव्ह ते ऑब्जेक्टिव्ह या प्रवासात पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमधल्या 'कवितेचे रसग्रहण करा' या प्रश्नाऐवजी 'काव्यपंक्ती पूर्ण करा' हा प्रश्न येऊ लागला आणि त्यामुळे कवितेच्या अर्थापेक्षा तिच्या पाठांतराला महत्व प्राप्त झालं. मग मुलांना त्या कवितेची गोडी कशी लागायची? त्यांना त्या कवितेबद्दल आत्मीयता कशी वाटायची?
पण असं जरी असलं तरी एक गोष्ट मात्र खरी, आपण सगळेच कायम कवितेच्या गावात जगत असतो. माणसाला कविता पावलो पावली भेटत असते, गवसत असते. आनंदात असलो की आपण गाणं गुणगुणतो, दुःखात आपल्याला आर्त गाणी आठवतात, प्रेमात पडलेल्या माणसाचं तर अवघ विश्वच काव्यमय झालेलं असत. कवितेचं एक अक्ख गाव आपल्या आत वसलेलं असतं... दडलेलं असतं.... गरज असते ती ते गाव शोधण्याची, त्या गावात रमण्याची.. एकदा का या कवितेच्या गावात आपण रमलो की मग आपसूकच हृदयातून गाणं स्फुरतं... म्हणूनच म्हंटल जात ... 'कवितेच्या गावा जावे, हृदयाचे गाणे गावे'
- बंबईवाली